Thursday, July 31, 2014

हरवलेल्या वाटा

आम्ही कॉलेजच्या व्हरांड्यात बोलत असताना मधूनच 'तो' निघून गेला 'ती' म्हणाली 'हा जरा विचित्र असल्यासारखा का आहे ? मी म्हणालो 'हो आहे जरासा तरीही तो आपला मित्र आहे, आणि तूच तर एकदा बोलली होतीस कि एखाद्या व्यक्तीला गुणदोषासाहित स्वीकारायचं, आणखी तसच काहीतरी.' ती म्हणाली ' हो ते पण आहे'. पुढे कॉलेजच शेवटच वर्ष संपल आणि सर्वजनण आप-आपल्या मार्गाला लागले. संपर्क कमी होत गेला आणि जवळपास अर्ध्या जणांचा संपर्क तुटला.

'तो' आणि त्याची 'ती' काही वर्ष भेटत राहिले, पुढे तिचंही लग्न झालं आणि त्यांचाही संपर्क तुटला गेला, मधल्या काही वर्षात पुण्याला जाणं होत असे तेव्हा त्याची भेट व्हायची, एका ग्लास कंपनीत जॉबला आहे म्हणाला, जरा जास्तच इमोशनल झाल्यासारखा वाटायचा, सारखं तिच्याविषयी विचारायचा आणि मी 'संपर्कात नाही रे ती !' अस म्हणून टाळून द्यायचो. असाच तीन, चार वर्षे प्रत्येक खेपेला भेटायचा. दरवेळी तिच्याशी एकदा तरी बोलायचं आहे अस बोलायचा. पण तिच्या आयुष्यात काही अडचणी नको होत्या म्हणून मी हि त्याच्यासाठी काही प्रयत्न केला नाही.


'तो' त्याच्या धुंदीत वगैरे कधीच नव्हता, एकलकोंडा पण नव्हता पण बोलायचा फार कमी, अंतर्मुख असल्यासारखा पण  नाही वाटायचा, तिच्यावर फार प्रेम करायचा, पण तिने आपला मार्ग निवडला होता, तिला स्वताच्या संसाराची काळजी होती तिच्या दृष्टीने सर्व संपल होत आणि तो मात्र अजूनही भूतकाळात जगत होता, त्यानेही काही वर्षानंतर लग्न केलं. त्याचही सर्व सुरळीत चालू झाल, पुन्हा पुण्याला गेलो तेव्हा त्याच्या घरी गेलो त्याची बायको पण होती, यावेळेस 'ती 'च्याबद्दल एकही शब्द बोलला नाही. असं वाटल झालं ! एकदाचा हा पण स्वतःच आयुष्य जगायला शिकला. पुन्हा एका वर्षांनी हा संपर्कात राहिला नाही त्याचा एक गावाकडचा मित्र अधून मधून संपर्कात होता मी त्याची चौकशी त्याच्याजवळच करीत असे, त्याच्याकडून समजले त्याला एक छान मुलगी झाली आणि आता तो गावीच असतो गावची शेती भरपूर आहे, घरचे विभक्त झाल्यामुळे त्याने गावीच राहायचा निर्णय घेतला होता. जवळच्या एक ज्युनिअर कॉलेजवर शिकवायचा.



एका सकाळी कधी नव्हे तो त्याच्या मित्राचा फोन आला, त्यामुळे कोणास ठाऊक पण फोन उचलायच्या आधीच मनांत शंकेची पाल चुकचुकली, मित्राने सांगितले ' काल रात्री एका जीपने त्याला उडवले आणि हॉस्पिटल मध्ये भरती करण्या आधीच तो गेला' त्याच्या अशा प्रकारे जाण्याची बातमी ऐकून डोक सुन्न झालं. नक्की काय झाल होत त्याची चौकशी केली, फार वाईट वाटलं मी आमच्या जवळच्या मित्रांना कळवतो अस सांगून फोन ठेऊन दिला आणि जवळच्या तीन चार मित्र आणि मैत्रिणींना कळवले सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. प्रश्न होता जिच्यावर तो प्रेम करत होता तिला कळवण्याचा, पण ते सहज शक्य नव्हते ती कोणाच्या संपर्कात नव्हती.


चारेक महिन्यांनी जवळच्या मैत्रिणीने तिला फोन केला आणि न राहून 'तो अपघातात गेला' असं सांगितले, पण 'ती' म्हणावी तेवढी दुखी झाली नाही दोन मिनिटातच तिने त्याच्याविषयीची माहिती घेऊन विषय बदलला, हे जेव्हा मला समजलं अस वाटलं प्रेमाबरोबर माणुसकी सुद्धा संपते का? एकेकाळी मैत्री आणि प्रेम याबद्दल भरभरून लिहणारे, वाचणारे आणि बोलणारे असे कोरडे ठाक का पडतात, एवढा संकुचितपणा येतो कसा ? कदाचित व्यवहारी जगाचा नियम 'ती' काटेकोरपणे पाळत असावी. 'तो' मात्र शेवटपर्यंत हेच समजत राहिला असावा कि 'ती' मला कधीच विसरली नाही

No comments:

Post a Comment