Monday, July 25, 2016

महानगरातला महासागर

अंधेरी वेस्ट ला आंबोली नाक्याजवळ एक साधे हॉटेल आहे तिथे एका दुपारी ओळखीच्या दोन लोकांसोबत चहा घेत बसलो होतो. मी दोन्ही पाय हॉटेलमधील टेबलाच्या मधल्या दांडीवर ठेवले होते आणि गप्पा मारत बसलो ते अर्धा - पाऊण तास कधी निघून गेला समजले नाही अचानक टेबलाच्या दांडीवरून खाली पाय घसरला आणि पाहतो तर अर्धा फूट पाण्यात पाय पडला. हॉटेलमधे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता  त्यामुळे तिथून आम्ही जवळच असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालो तर रस्ता पाण्याखाली केव्हाच गेला होता. ऑफिसच्या गेटजवळ बरेच जण उभे होते आणि ऑफिसचा सुरक्षा रक्षक आम्हाला वर जाण्यास मनाई करत होता, आता घरी जाण्यासाठी निघायची घाई करायची होती पण पुढच्या काही तासात परिस्थिती भयंकर होणार होती याची काहीच जाणीव नव्हती तर फक्त पाऊस जास्त पडतोय असे वाटत होते तो दिवस होता २६ जुलै २००५.  

 ऑफिसच्या गेटबाहेर अर्ध्या फुटांचं पाणी गुडघ्या पर्यंत आले होते आणि लोक एकामागोमाग अंधेरी स्टेशन च्या दिशेने चालत होते, मी पण त्या गर्दीतून चालत काही अंतर चालत राहिलो वरून पाऊस धो-धो पडत होताच, आंबोली नाक्यावरून स्टेशनकडे जाताना अंधेरी ईस्ट ला जाण्यासाठी एक सब-वे आहे तो काहीसा उताराचा भाग आहे त्यामुळे एस व्ही रोड वरून येणारे सर्व पाणी त्या सब-वे मध्ये खूप वेगाने जात होते मला ते धोक्याचं वाटत होते म्ह्णून काही अंतरावर एका दुकानासमोर काही वेळ उभा राहून अंधेरी ईस्टला कोणत्या दिशेने जावं याचा मी विचार करत होतो इतक्यात एक माणूस त्या सब-वे च्या खाली पाण्याच्या वेगाने ओढला गेला आणि क्षणात नाहीसा झाला आता मात्र काय करावे ते सुचेनासे झाले. अशा परिस्थितीत काही लोक पुढे जाण्याचे धाडस करत होते आणि तिथले स्थानिक लोक त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते, पण ऐकतील तर ते लोक कसले, शेवटी स्थानिक लोकांनी काठ्या काढून लोकांच्या पायावर मारायला सुरवात केली तेव्हा कुठे लोक मागे वळले आणि पर्यायी रस्ता म्हणून त्यांच्या मागोमाग मी ही आंबोली रेल्वे फाटकाकडे चालत निघालो पण माझ्या डोळ्यासमोर त्या पाण्यात वाहून गेलेल्या माणसाचा विचार अजून डोक्यातून गेला नव्हता, नदी किंवा समुद्रात असे प्रकार सर्रास घडतात पण माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यावर माणुस वाहून जातो अशी ही भयंकर परिथिती होती पण महानगरात आलेल्या पुराचा खरा सामना अंधेरी ईस्ट मध्ये होणार होता. 

आंबोली फाटका जवळ आलो तेव्हा अचानक खिशातल्या मोबाईल ची आठवण झाली घरी आधीच काळजी करू नका म्हणून फोन केला होता, चार वाजेपर्यंत एमटीएनएल सेवा चालू होती तर मोबाईल सेवेने केव्हाच जीव टाकला होता त्याच्या ही स्क्रीनवर महापूर आला होता, मग खिशात फोन टाकून पुन्हा चालायला लागलो, अंधेरी ईस्ट चा भाग खोलात आहे त्यामुळे पावसाचे सर्व पाणी ईस्ट मध्ये जमा होत होते, डोक्यावर पावसाची रिमझिम चालू होती. कसाबसा चालत दीड तासाने नटराज स्टुडिओ जवळ पोहचलो तिथे छातीएवढे पाणी लागले तरी लोक चालत होते आणि मी ही मागोमाग पंढरीच्या वारीला निघाल्यासारखा चालत होतो फक्त पोहता येत होते याच विश्वासावर. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जवळ थोडा उंच भाग आहे तिथे पाणी कमी होते मग दहा मिनीटे तिथे थांबून पुन्हा चालायला सुरवात केली पुढे गेल्यावर एक स्कुलबस अर्धी पाण्यात उभी होती आणि पंचवीस तीस लहान मुले केविलवाण्या नजरेने महापूर पहात होती जवळच एक केळीचा गाडा तरंगत होता त्यातील काही केळी बरोबर चालत असणाऱ्या एका व्यक्तीने बसमधील मुलांना दिली. शेवटी पाण्यातून चालण्याचा वैताग आला आणि दुभाजकावर चढून चालू लागलो. चकाला -जेबी नगर  एयरपोर्ट मार्गे कधी पाण्यातुन कधी दुभाजकावरून चालत मरोळ मध्ये पोहचलो. मुंबईची जी अवस्था झाली होती ती सर्वानीच टी व्ही वर पहिली. पण मी चार तास पाण्यातून चालत सुखरूप पोहचलो तेव्हा आयुष्यात पहिला महापुराचा अनुभव घेऊन आलो होतो. आज या घटनेला अकरा वर्ष पूर्ण झाली.      

Thursday, July 14, 2016

उलटा धबधबा - सडावाघापूर

विस्तीर्ण अशा पठारावर प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा आणि समोर कोणत्याही डोंगर-पर्वताचा अडसर नाही त्यामुळे धबधब्यावर पडणारा वाऱ्याचा दाब त्यातून निर्माण झालेला 'रिव्हर्स' - किंवा उलटा धबधबा. पुणे -बेंगलोर हायवेवर साताऱ्यापुढे उंब्रज हे गाव आहे या गावाजवळून २३ किलोमीटर सडावाघापूर हे पठारावर लहानसे गाव आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर हा पठाराचा भाग 'मिनी महाबळेश्वर' म्ह्णून ओळखला जातो. आजूबाजूला सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगा आहेत,पठारावर प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे काही निमुळत्या ठिकाणी हे पाणी एकत्र येऊन उलटे धबधबे तयार झाले आहेत.
                 सडावाघापूर हे सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील ठिकाण आहे तिथूनच ४० कि. मी. अंतरावर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे 'कोयना' धरण आहे महाराष्ट्राला वरदान ठरलेला जलविद्युत प्रकल्प आहे. कोयनेवरून पुढे चिपळूण -डेरवण तसेच  रत्नागिरीचा कोकण भाग पर्यटनासाठी खुणावतो. सोसाट्याचा वारा आणि पाऊस अनुभवायला सडावाघापूर ला जरूर भेट दया.            


Saturday, July 2, 2016

दर्शन

सव्वापाच च्या सुमारास पाऊस बंद झाला आणि श्रावणात पडतो तसा सूर्यप्रकाश पडला होता, दिवस मावळायला अजून तासभराचा तरी अवकाश होता मग छत्री न घेताच टेकडीवर जाण्यासाठी बाहेर पडलो. ही टेकडी म्हणजे मध्यम उंचीचा डोंगरच, गावापासून साधारण दोन किलोमीटर दूर अशा  या टेकडीवरून आमच्या शहराचा वेध घेण्यासाठी अतिशय सूंदर स्थान आणि आजूबाजूच्या खेड्यांचे नदीचे आणि दूरवर असणाऱ्या उंच किल्ल्याचे दर्शन येथून व्यवस्थित होते.

पायी पायी टेकडीजवळ पोहचलो तेव्हा पठारावरच्या पवनचक्की चे कर्मचारी मोटारसायकल आणि जीपने परतत होते त्यामुळे पंधरा-वीस मिनिटे वाहनांची घरघर चालू होती काही वेळाने वातावरणात शांतता पसरली. टेकडीवरचा सर्व भाग ओलसर, हिरवागार आणि  स्वच्छ दिसत होता, उन्हात सूर्याजींच्या झळांनी पिवळे झालेले गवताचे आच्छादन हिरवे आणि प्रफुल्लीत होऊंन वाऱ्यामुळे डोलत होते. पाऊस नुकताच थांबला होता त्यामुळे टेकडीवर बोटाएवढे पाण्याचे छोटे प्रवाह वाहत होते. एका मध्यम आकाराच्या दगडावर बसून समोर जे जे दिसेल ते पाहण्याच्या प्रयत्न करू लागलो पण नजरेच्या आवाक्या बाहेरचे विहंगम दृश्य पाहता पाहता नजर स्थिर होत नव्हती  पश्चिमेला डोंगर आणि ढगांची युती झाली होती,  ढग आणि डोंगर माथ्यावरून बाहेर पडणारी तिरपी सूर्यकिरणे यामुळे एका बाजूच्या निरभ्र आकाशात लखलखीतपणा आला होता. 

शहरातच्या मध्यभागात कचेरी,महाविद्यालय आणि नदीजवळच्या लक्ष्मीमातेच्या मंदिराचे झाडांमधून दर्शन होत होते. गावाच्या दोन्ही बाजूला दोन नागमोडी नदया आणि एका वळणावरचा झालेला संगम, आणि नदीच्या मार्गावर रांगेत उभी असणारी अशोका आणि निलगिरीची झाडं पाहून असं वाटलं अजून कशाची कमी असावी.  नदीपलीकडे सात-आठ  खेडेगाव आणि छोटया वाड्या वस्त्या आहेत,  मावळत्या सूर्याचा प्रकाश ढगांच्या भगदाडातून एका छोट्या गावावर पडत होता. डोंगराजवळ धुके दाटले होते त्यामध्ये काही गावं हरवली होती. गावातल्या घरांचे पत्रे आणि कौलारू छ्प्पर लक्ख उठून दिसत होते. कौलांच्या मधून बाहेर पडणारा चुलीचा धूर हे दृष्य खूप विलक्षण वाटत होते तिथल्या शांत मानवी अस्तित्वाची जाणीव करून देत होते.       

एव्हाना सूर्य डोंगराआड लपून गेला होता हवेतला गारवा अंगाला चांगलाच जाणवायला लागला होता पण समोरचं निसर्ग रुप पाहून माझी समाधीच लागली होती. इतक्यात एक म्हैस घेऊन चाललेल्या आजोबांचा आवाज कानावर आला 'ओ पाव्हणं, पाऊस ईल आता बघा हिकडं भरून आलंय' आणि मी हसून 'आव मी पाव्हना नाही इथंच गावातला आहे, मुंबईला असतो' असं म्हणालो. आजोबा ही हसले आणि ' तस न्हाय निघा लवकर आता अंधार बी पडल असं म्हणाले. आणि मी ही परतीची वाट धरली आणि मनात विचार आला काही दृष्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखी असतात पण काहीवेळा त्यांना मनातच आणि स्मृतीत बंदिस्त करण्यात काही औरच मजा असते. चालताना नदीजवळच्या मंदिरातून संद्याकाळच्या हरिपाठाचे सूर कानी पडत होते. 
                                                           जय जय राम कृष्ण हरी 
                                                           जय जय राम कृष्ण हरी