Wednesday, June 8, 2016

वरुण मला माफ कर !

मी इकडे खाली आहे. तू पूर्वेकडून- पश्चिमेकडून नाहीतर कोणत्याही दिशेकडून ये कारण आता आठ जून सुद्धा उलटला. माझी विनंती इथून तू स्विकार कर. मला पूर्वीचे दिवस आठवतात अजून शाळेत जाताना झोडपून काढायचास. खूप गरम होतंय आता सहन नाही होत, दुपारी जमीन तापते अंगाची लाही लाही होते. मला माहित आहे मी कशाच्या आधारावर तुझी विनंती करणार अजून आयुष्यात साधं एक रोपपण नाही लावलं, पण आम्हाला निसर्गाकडून सर्व काही फुकटात घ्यायची सवय आहे. आजूबाजूला उंचच उंच इमारती दिसतात त्याचं कौतुक वाटत पण एखादा डवरलेलं झाड दिसत नाही त्याची खंत वाटत नाही, हे असले आम्ही !
                     विहरी आटल्या, ज्या धरणाची भिंत पाहून पोटात भीतीचा गोळा यायचा तिथला तळ दिसतोय. नदीच्या बाजूची हिरवीगार शेती आता उजाड दिसतेय. वणवण भटकून सुद्धा आता पाणी मिळत नाही शेती तर इतिहासजमा झाली.  कुटुंब च्या कुटुंब गाव सोडून शहरात येताहेत. शहरातल्या स्टेशनवर बस थांब्याजवळ तर कधी रस्त्यात म्हातारे आजी आजोबा भिक मागताना दिसतात. आता तुला वरुण राजा म्हणतो सांग ते भिकारी आहेत का ? पांढरा सदरा  धोतर गळ्यात तुळशीची माळ कपाळावर अष्टगंध, हाथ पसरणारा आपला नवरा पाहून नजर चोरणाऱ्या लुगड नेसलेल्या आणि खांद्याला पिशवी अडकवलेल्या आजी पण आता हाथ पसरू लागल्या आहेत. जगण्याच्या लढाईत तहान - भुकेने शरमेवर मिळवलेला विजय आहे तो !

                       मला बाकीच्या लोकांचे काहीच माहित नाही पण गावच्या शेतात् किमान पंचवीस झाड लावण्याचा माझा विचार आहे आणि त्या झाडांच्या जोपासनेची व्यवस्था  एवढा वेळ नक्की मिळेल. पण त्यासाठी तुला  मुसळधारपणे यावं लागेल म्हणून सांगतो>>>>>> मी इकडे खाली आहे. तू पूर्वेकडून- पश्चिमेकडून नाहीतर कोणत्याही दिशेकडून ये कारण आता आठ जून सुद्धा उलटला. माझी विनंती इथून तू स्विकार कर. वरुण मला माफ कर !   

(आपण ही पोस्ट वाचताना आजपर्यतच्या आयुष्यात किमान एक वृक्ष लावला असेल तो वाढवला असेल तर किंवा लावणार असाल तर hemant_hemdeep@rediffmail.com वर आपला अनुभव कळवा, किवा अभिप्राय लिहा)