Thursday, June 1, 2017

रंजस



मागचा लेख जुलै महिन्यात लिहला होता त्यानंतर एक वर्षांनी हा लेख लिहीत आहे, तर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात  पावसाची सुरुवात होते. म्हणजे  एखादे शहर, छोटे नगर किंवा खेडेगाव असो कि वाडी- वस्ती, पाऊस सुरवातीला सगळ्यांना सळो कि पळो करून सोडतो. पाऊस चांगला दोन आठवडे लागला कि बरेच लोक त्या पावसाळी वातावरणात रुळलेले असतात. लोकांचे वागणे- बोलणे त्या पावसाळी वातावरणाला साजेसे असते पण समाजात काही असे तरुण लोक असतात त्या पावसाने त्यांच्या चेहऱ्यावर एक अवकळा आणलेली असतो तिला मी नाव दिलं  'रंजस'

काय आहे हे रंजस प्रकरण ? एका प्राध्यापिकेने सहज वापरलेला शब्द माझ्या चांगलाच लक्षात राहिला. मी कधीही मराठी शब्दकोषात त्याचा अर्थ किंवा वर्णन जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण हा शब्द मला फक्त जून किंवा जुलै महिन्यात आठवतो आणि लगेच विसरूनही जातो. माझा एक मित्र जो स्टुडन्ट अँड टीचर काउन्सेलर आहे, तो आणि मी जेव्हा प्रेमभंग या विषयावर बोललो तेव्हा हा 'रंजस' शब्द अचानक माझ्या तोंडून आला. त्यावर आम्ही वेगवेगळे संदर्भ देऊन चर्चा केली आणि शक्यतो पावसाळ्यात येणाऱ्या एका ठराविक लोकांच्याचेहऱ्यावरच्या भावाला हे नाव दिले.

    'रंजस'  म्हणजे चेहऱ्यावर दिसणारी नाराजी, मग प्रश्न पडतो कि पावसाळ्यातच का पसरते चेहऱ्यावर अशी नाराजी, जून आणि जुलै मध्ये पाऊस खूप पडत असतो त्यावेळी रस्त्यावर आणि घराबाहेर लोक कमी दिसतात, एकतर ते घरी किंवा कामाच्या ठिकाणी असतात अशावेळी एकाकी असणारे लोक अजून एकाकी होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तोच 'रंजस' भाव प्रकट होतो. त्याला मुख्य करून प्रिय व्यक्तीचा विरह हे एक कारण असते, मग तो मित्र -मैत्रीण किंवा नातलग  असो, माझा मित्र आणि मी अशा काही लोकांशी बोललो आणि त्यांची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा खूप जवळच्या लोकांशी झालेली ताटातूट हेच जास्त प्रमाणात मोठे कारण होते. यामध्ये तरुण वयात अनपेक्षितरित्या झालेला प्रेमभंग जास्त कारणीभूत असावा असं मला वाटतं. पुरुष हे सर्वाधिक 'रंजस' असतात कारण पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त हळवे असतात तर स्त्रिया सहनशील

काळीज पिळवटून टाकणाऱ्या आठवणी येणं त्यावेळी जवळ आपलं कोणीही नसणं त्यात पाऊस हा शक्यतो प्रेमाचा साक्षीदार किंवा प्रेमभावना उत्पन्न करणारा असतो अशी कुमारवयांपासूनची शिकवणूक कथा -कवितांमधून झालेली असते त्यामुळे तो एकाकी व्यक्ती मोकळेपणाने बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकला नाही तर अशी भावना चेहऱ्यावर दिसते तेच त्यांच 'रंजसपण'. कोणी म्हणेल कामधंदे नसणारे लोक असा विचार करु शकतात किंवा ते अति हळवे असतील पण खरोखर भावनेवर या जगाचा डोलारा उभा आहे नाहीतर यशस्वी होण्यासाठी सकारात्मक भावना जोपासा असं संदेश जगात का फिरला असता, तशीच ही एक नकारात्मक भावना आहे. मानसशात्रज्ञ यावर मिळून मिसळून राहावे किंवा नवीन मित्र जोडावेत असे उपाय देत असतीलही पण तो एक अतीव दुःखाचा अनुभव आहे जो भविष्यकाळासाठी त्या व्यक्तीला कणखर बनवू शकतो, पण त्या एकाकीपणातून तो तरला पाहिजे.