Thursday, March 31, 2016

कल्पनाच पण अशी हवी !



एक ग्रुप एड्मीन काही दिवसांपासून सतत च्या चेटिंग मेसेजस मुळे  हैराण झाला होता, दर दोन मिनिटात मोबाईल वर  मेसेजचा  'टुंग ' असा आवाज येत होता. भरीस भर म्हणून मधूनच 'आ s s s s s शांताब्बाई' अस कोणीतरी बोम्बलेले  वोईस मेसेजेस, व्हिडीओ  आणि ग्रुप चेटिंगमध्ये एकमेकांना दिलेल्या भयंकर शिव्या, हे असला धिंगाणा सुरु झाला कि एक दोन तास गप्प बसण्याच कोणी नाव घेत नसे. ही रोजची कटकट झाली होती म्हणून अखेर त्या एड्मीनने ग्रुप डिलीट करायचा निर्णय घेतला, पण यावर काही उपाय सुचतोय का हे पाहण्यासाठी थोडा वेळ घ्यावा अस ठरवलं, फक्त उपाय असा पाहिजे होता कि हे चेटिंग मेसेजस बंद न होता यामधून काहीतरी चांगली गोष्ट घडावी. नक्की काय करायचं हेच एड्मीनला सुचत नव्हते आणि दोन दिवसानंतर तो ही  हे सर्व विसरला आणि आपला कामात व्यस्त झाला तोपर्यंत अधूनमधून शांताबाई, गण्या, बंड्या, बाई  आणि मास्तर यांचा ग्रुपवर धिंगाणा चालूच होता.

एका संध्याकाळी एड्मीनने त्याच्या सोसायटी बाहेर 'दोन दिवस पाणी येणार नाही' असा फलक वाचला, महानगरपालिकेने पाणी कपात केली आहे हे समजले त्यामुळे सोसायटी अध्यक्षाला बोलून काही उपयोग नव्हता, पाणी कपातीचा पहिला दिवस संपला आणि एडमीनच्या घरातील पाण्याचा साठासुद्धा पहिल्याच दिवशी संपला आणि त्याच दिवशी संध्याकाळी एडमीन पाण्यासाठी सोसायटीच्या आवारात पाण्याच्या टेंकर मागे रांगेत उभा होता. 'दोन्ही हातात दोन बादल्या घेतलेला एडमीन'  अशा अवतारात त्याचा ग्रुपवर आणि फेसबुकवर फोटो प्रसिद्ध झाला. दुसऱ्या दिवशी तर पिण्याच्या पाण्यासाठी एडमीन मिनरल वॉटरच्या बाटल्या शोधत फिरत होता. महानगरपालिकेच्या कृपेने दोन दिवसानंतर पाणी पुरवठा नियमित झाला होता पण पुन्हा पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही याची काहीच शाश्वती नव्हती.
    
या दोन दिवसात पाण्यासाठी झालेल्या त्रासातून ग्रुपवर येणाऱ्या फालतू मेसेजस काय करायचं यावर एडमीनला उपाय सुचला होता आणि त्याप्रमाणे तो कामाला लागला. प्रथम एडमीनने  जो जास्त फालतू मेसेज पाठवण्यात वेळ घालवतो अशा एका ग्रुप सदस्याला ग्रुपमधून काढून टाकले आणि त्याला फोन कॉल केला आणि तो सदस्य जिथे राहतो तिथल्या पाणी पुरवठा स्थिती विषयी माहिती घेतली असे करून एक एक करत जवळपास ४२ जणांना ग्रुप मधून काढून त्याने फोन कॉल केले आणि माहिती घेतली तर जवळपास सर्वजण पाणी प्रश्नामुळे वैतागले होते  सर्व उपनगरात हीच स्थिती होती आणि मे  महिन्यापर्यंत ही परिस्थिती अजून भयानक होणार होती याची जाणीव सर्वांना एडमीनने करून दिली आणि त्यासाठी कमी वेळखाऊ पण परिणामकारक काम करण्याची विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे सर्वजण तयार झाले.

आता एक नवीन नावाचा ग्रुप तयार झाला होता. ग्रुपचे नाव होते 'एक बादली पाणी' एडमीन तोच होता ग्रुप सदस्य तेच होते फक्त ग्रुपचे नाव आणि मेसेज पूर्ण बदललेले होते. ग्रुप मध्ये ४२ सदस्यापैकी ३६ सदस्य अतिशय उत्साही होते. प्रत्येकाला रोज आपल्या रोजच्या वापरातील कमीतकमी १ बादली पाणी वाचवायचे होते आणि त्यासाठी काही उपाय प्रत्येकाने शोधून ग्रुपवर पोस्ट करायचे होते. सुरवातीला काही उपाय एडमीनने सुचवले.

१) घरात पाण्याची टाकी सोडून इतर भांड्यात असणारे पाणी ओतून न देता एका बादलीत साठवायचे आणि ते कपडे, भांडी धुण्यासाठी वापरायचे. 

२) बाथरूमच्या वर बसवतात त्या टाकीतील पाण्याचा उपयोग इतर भांड्यातील पाणी संपल्याशिवाय करायचा नाही. 

३) पाण्याचा नळ सोडून ब्रश करणे, दाढी करणे असली कामे करायची नाहीत.

४)  शॉवर चा वापर टाळून आणि आपली गरज ओळखून पाणी टाकीतून घ्यायचे.

पाणी वाचविण्यासाठीचे असे अनेक उपाय एकमेकांना सुचवून या ग्रुपने गेल्या ४० दिवसात प्रती माणसी कमीतकमी १ बादली खाली दिल्याप्रमाणे पाणी वाचवले. प्रत्येक दिवशी आपापले पाणी वाचविण्याचे  मेसेजेस, व्हिडीओ शेअर केले.         

 ३६ सदस्य X  १ बादली (१८ लिटर) = ६३८ लिटर प्रत्येक दिवसाला पाणी वाचविले
६३८ लिटर X ४० दिवसात =  सुमारे २५५२० (पंचवीस हजार पाचशे वीस लिटर पाणी वाचविले. -अजून पाणी वाचवा मोहीम चालूच आहे)  

आपल्या सर्वांकडून नकळत दिवसभरात कितीतरी पाणी वाया जात असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्यावर थोडे लक्ष देऊन आपण ही 'पाणी वाचवा' ही मोहीम राबवू शकतो. पण गरजे पेक्षा जास्त मिळणाऱ्या वस्तूला मोल नसते. तुम्ही कोणाला काही सांगायला गेलात तर अशी उत्तरं येतील की " पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आणि आणि २९ टक्के जमीन आहे'  त्यावेळेस अस उत्तर दया कि ७१ टक्के पाणी आहे मग १ लिटर पाण्यासाठी लाज नसल्यासारखे २० रुपये का मोजता ?       

Tuesday, March 1, 2016

माझी गोवा 'वारी'

'मी गोव्याचा brand ambassador झालो तर?' या विषयावर मी खूप छान निबंध लिहू शकतो. गेल्या १५ वर्षात मी  ४ वेळा गोव्याला जाउन आलो. थोडक्यात गोवा हे माझं आवडत ठिकाण आहे!  दरवेळी गोवा भेटीत माझ्याबरोबर वेगवेगळे मित्र होते. यावेळी वास्को वास्तव्यास होतो त्यामुळे पणजी आणि गोव्याचे प्रसिद्ध समुद्रकिनारे यापासून बराच लांब प्रवास करून जावं लागत असे. दुचाकीचा पर्याय होता पण पहिला दिवस प्रवासाने थकलो होतो आणि तो दिवस वाया जाऊ नये म्हणून दुचाकीवरून वास्को जवळ एक 'बोगमालो' नावाचा समुद्रकिनारा आहे तिथे गेलो . इतर ठिकाणापेक्षा या समुद्रकिनाऱ्यावर कमी गर्दी असते. पहिला दिवसभर याच समुद्र किनाऱ्यावर आम्ही फिरत होतो.  संध्याकाळी वाळूत मित्रां बरोबर गप्पा मारत बसलो होतो अंधार पडू लागला तेव्हा मित्रांपासून हळूच थोडा दूर येऊन समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ गेलो आणि दूरवर एक जहाज होत त्याकडे पाहत बसलो. त्या दिवशी भरती असल्यामुळे मोठा आवाज करत फेसाळणारया लाटा किनाऱ्यावर येऊन पुन्हा त्याच वेगाने परत समुद्रात मिसळत होत्या. हे किती तरी वेळ स्वतःला विसरून पाहत होतो. जगात कितीतरी गोष्टी विशाल आहेत पण मला समुद्राच विशालपण खूप अवर्णनीय वाटत. काही वेळाने मित्रांची बोंब ऐकायला मिळाली आणि मुकामाच्या ठिकाणी निघालो.


वास्को हवाई अड्डा ज्याला 'गोय' किवा 'देबोलियम' ऐअर पोर्ट म्हणतात तिथुन एक किलोमीटर जवळ आम्ही तळ ठोकून होतो. पहिल्या दिवशी दुपारी आम्ही मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो साधं पण बऱ्यापैकी हॉटेल होत ते , जवळच काही मंडळी 'शांभवी' घेत बसले होते. दारू …! त्यांच्याकडे पाहून आणि त्याचं बोलण ऐकून अस वाटत होत कि रोज सकाळी आणि संध्याकाळी थोडीतरी घेतली पाहिजे असा गोवा वासीयांचा नियम असला पाहिजे. तस गोवा आणि दारू हे नात खूप सहज जोडलं जात कारण एकतर तिथं एकामागोमाग दारूची दुकान असतात, आणि तीथे ती स्वस्तही मिळते आणि पिवुन तुम्ही गाडीही चालवू शकता.  ड्रंक अंड ड्राऐव्ह हा नियम नाही (कृपया मी दारूचा उदोउदो करत नाही) कारण आताच नटसम्राट चित्रपटाची समीक्षा वाचली होती. त्यात दारूपुराण बरच सांगितलं होत अस समीक्षकाच म्हणण होत पण शांभवी हा नवीन शब्द मला याच चित्रपटातून ऐकायला मिळाला, असो पण गोव्यातला  बिनधास्तपणा तिथल्या वातावरणाला शोभून दिसतो हे वास्तव आहे.

गोव्यात मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशी हॉटेल सहज मिळत नाहीत. आणि भुकेच्या तडाख्यात आपण एखाद्या हॉटेलात गेलो तर चांगलं जेवण मिळेलच याची शाश्वती नाही. आणि इथे भरपूर समूद्र किनारे आहेत म्हणजे प्रत्येक हॉटेलात वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला मिळत असावेत हा फक्त एक समज आहे. त्यामुळे चांगला दर्जा ठेवला तर गोवा हे हॉटेलिंगच्या व्यवसायात पडू पाहणाऱ्या एखाद्या मराठी माणसाला उद्योगाच प्रवेशद्वार होऊ शकत. बाकी समुद्राजवळ आणि  पणजी, वास्को, तसेच मडगाव या शहरात स्वच्छता चांगली ठेवली आहे . रस्ते रुंद आहेत, ठिकठिकाणी पोलिस दिसत नाहीत पण अपघात सुद्धा जास्त पाहायला मिळाले नाहीत.

गोवा उशिरा स्वतंत्र झाला येथे पोर्तुगीजाचं राज्य होत, देशात सर्वाधिक परदेशी पर्यटक गोव्यात येतात त्यामुळे इथल्या लोकांच्या किंवा मुळातच गोव्याच्या संस्कृतीला वेगळा मुलामा आहे, म्हणून इथे आलेले देशी पर्यटक यात काही दिवस हरवून जातात. दरवेळी प्रमाणे माझी ही गोवा 'वारी' संपली होती पण परतीच्या प्रवासासाठी माझा पाय निघतच नव्हता.  
                 

Thursday, February 18, 2016

बातमी २५१ रुपयांच्या स्मार्ट फोनची !

खरी कि खोटी माहित नाही पण २५१ रुपयांच्या मोबाईलची बातमी सकाळपासून ऐकायला, वाचायला मिळत होती, म्हणून मी freedom कंपनीच्या वेबसाईट ला भेट दिली. गुगल वर सर्वात वर या कंपनीच्या बातमीची लिंक मिळाली. मी तो मोबाईल book  करणार नव्हतो हे आधीच ठरवलं होत. फक्त मला नेमका काय प्रकार आहे ते पाहायचं होते. इतर कंपन्या जो मोबाईल ८ ते ९ हजार रूपयात देतात त्याच दर्जाचा मोबाईल  ही  कंपनी रुपये २५१ मध्ये म्हणजे १ किलो  तुरडाळी च्या दरात देत आहे तर बघूया.  आता हा फसवणुकीचा प्रकार असेल तर ?  या कंपनीला कोणतीही इलेक्ट्रोनिक उत्पादनाची पार्श्वभूमी नाही, कंपनी २०१५ मागील वर्षी स्थापन झाली आहे. कंपनी अस काय करते ज्यामुळे त्याना एवढा स्वस्त मोबाईल ग्राहकांना देण परवडेल अगदी ना नफा ना तोटा तत्वावर दिला तरी,  चार पानांच्या बेवसाईट वर book  करण्यासाठी पहिला पर्याय लगेच दिसतो. दुपार पर्यंत ६ लाखांवर हिट्स येऊन कंपनीचा सर्वर बंद झाला आणि तो २४ तासांत व्यवस्थित होईल अशी एक विनंती वेबसाईट वर दिसत होती. तितक्यात अजून एक बातमी सोशल मिडीयावर झळकायला लागली ती म्हणजे (कंपनी फसवणूक करणार आहे )  या कंपनीची अजून एक वेबसाईट आहे riningigbell.co.in त्यावर हाच मोबिल रु. २९९९ ला विक्रीला आहे.

आता प्रश्न आहे २५१ रुपयांचा, आता जो नेटबँकिंग करतो तो नक्कीच सुशिक्षित असणार आणि त्याला ही  रक्कम फार मोठी नाही आणि फसवणूक झाली तर एवड्या रकमेसाठी ग्राहक कोर्टात कशाला जाईल. समजा  जर १ लाख लोकानी जरी हा मोबाईल  book  केला तरी  कमीतकमी रुपये २५१००००० (अडीच कोटी) इतकी मोठी रक्कम कंपनीच्या घशात जाईल. विश्वास बसावा म्हणून की काय वेबसाईटवर  'मेक इन इंडिया'  चा संदर्भ दिसतो. Contact Us  वर क्लिक केली कि आपलीच माहिती भरावी लागते,  पण book  करणाऱ्यांना ४  महिन्यानंतर  यावर्षी जून मध्ये खर -खोट कळेल कारण कंपनी जूनमध्येच मोबाईल घरपोच देण्याचं आश्वासन देत आहे पण सध्या तरी  खर काय आहे ते आश्वासन देणाऱ्या कंपनीलाच माहीत. 

Monday, August 24, 2015

दोन पहाड

बिहार मध्ये गया जिल्हयात गेहलोर या मागासलेल्या एका छोट्या गावात एक सामान्य माणूस एकटा डोंगर पोखरुन आपल्या गावासाठी रस्ता तयार करायच ठरवतो आणि एक मोठी संघर्षयात्रा सुरु होते . आपल्या पत्नीचा जीव ज्या पर्वतावर पाय घसरुन गेला त्या पर्वताचा भेद करुन एक रस्ता तयार करण्याचा निश्चय करतो ज्यामुळे हजारो लोकांना पर्वताला परिक्रमा घालताना होणारा त्रास कमी होईल ही जनोपयोगी भावना.

नाव दशरथ मांझी ३६८ फुट लांब आणि २५ फुट रुंद रस्ता बनविन्याचा विडा उचलल्या सारखा दोन हाथ करायला सुरुवात करतो आणि २२ वर्ष हा व्यक्ति आपल्या श्रमाने आणि क्लूप्तिने या पर्वताचा भेद करतो. पण इतकी साधी आणि सोपी गोष्ट असेल का हो ही! दुष्काळ आणि सतराशे साठ विघ्न याना तोंड देत हा तपस्वी पर्वताला स्वतच दिलेले आव्हान पूर्ण करतो. हा संघर्ष उत्तमरीत्या मांझी या चित्रपटात दाखवला आहे.
दशरथ मांझीने हातात घेतलेले काम आणि २२ वर्षे शारीरिक कष्ट आणि येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडु शकले असते आणि पर्वत फोडून रस्ता तयार करण्याचे आव्हान कधीच संपुष्टात आले असते, पण स्वतःच्या २५ पट जास्त वजन उचलु पाहणाऱ्या प्रयत्नवादी मुंगी कडून प्रेरणा घेतल्यासारखी पराकष्टा करुन रस्ता तयार केला.

२००७ मध्ये दिल्ली येथे एका रुग्णालयात कैंसरशी झुंज देत शेवटचा श्वास घेतला. राजकिय उदसिनतेमुळे गेहलोर गावासाठी पक्का रस्ता त्यांच्या मृत्युनंतर ४ वर्षानी तयार झाला.दशरथ मांझीच्या मिडिया वरील एका मुलाखती मध्ये ते म्हणतात जोपर्यंत ही पृथ्वी आहे तो पर्यन्त हा रस्ता राहील. एका पहाडाशी दुसऱ्या पहाडा एवडया व्यक्तिमत्वाने घेतलेली मैत्रीपूर्ण झुंज म्हणजे सकारात्मकतेची गाथा झाली.

Saturday, April 25, 2015

आपली शाळा


आमची चौथी' पर्यंतची प्राथमिक शाळा म्हणजे 'जीवन शिक्षविद्या मंदिरहे शाळेचे नाव मला आजही सुंदर वाटते, मारुतीच्या मंदिरात भरणाऱ्या बालवाडीतून आमची रवानगी प्राथमिक शाळेत झाली. मोजके शिक्षक आणि शिक्षिका असणाऱ्या या शाळेत आम्ही काय शिकलो हे पूसटसं आठवते पण त्या शाळेतल्या शिक्षणाच्या दर्जाची मी कधीच खंत ठेवली नाही, त्यावेळी आमच्या गावात इंग्रजी शाळा यायला अजून दशकभराचा अवकाश होता. त्यामुळे प्राथमिक आणि पुढे माध्यमिक शिक्षण मराठीतून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

एक छोटे प्रवेशद्वार त्यावर शाळेचे नाव आणि कुंपणाच्या आतमध्ये अेल्युमिनिअमचे पत्रे असणाऱ्या भिंतीचे पाच वर्ग होते. सर्व शिक्षक आठवत नाहीत पण एक 'खान गुरुजी' म्हणून मुख्याध्यापक होते ते मात्र आजही आठवतात त्याला कारणही तसेच आहे, हे खान गुरुजी आमच्यादृष्टीने जगातला सर्वात मोठा माणूस होता कारण तोपर्यंत शाळा आणि घर हेच आमचं जग होत. नक्की आठवत नाही पण तिसरी किवा चौथीच्या एका चाचणी परीक्षेत ' भारताचे पंतप्रधान कोण ? असा प्रश्न होता त्यावर उत्तर म्हणून 'खान गुरुजी' हे नाव बहुमताने मंजूर झाल्यासारखे सर्व विध्यार्थ्यानी लिहिले आणि आमच्या वर्गशिक्षिकेने त्याचा राग आमच्यावर असा काढला होता कि आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर त्यांचे नाव द्यायला हवे होते कि काय असे वाटले.      

चौथी पर्यंतच्या शाळेत दुध पिणे हे सर्व विध्यार्थ्यांसाठी बंधनकारक होते त्यामुळे आम्ही नाक बंद करून घटाघट ते  पिउन टाकत असू, त्यावेळी शाळेतले दुध पिणे हा आम्हाला सार्वजनिक अत्याचार वाटत असे त्यामुळे त्या बालवयात आमच्या मनात असंतोष मूळ धरू लागला होता, अशातच एकदा शाळेने 'गांधी टोपी' सर्वांसाठी अनिवार्य केली. आणि जवळ पास पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश देत शाळेला सलग दोन दिवस दांडी मारली. शेवटी शाळेने नमते घेत गांधी टोपीचा निर्णय रद्द केला. आमच्या विरोधाला कारण होत कि मुली गांधी टोपी घातल्यावर आम्हाला हसतात.            

शाळेच्या कुंपणाबाहेर मीठ टाकलेल्या बोरांची आणि चिंचाची चव जिभेवरून मनावर उतरल्यासारखी अजूनही तशीच आहे. माध्यमिक शाळेत जाईपर्यंत चौथीतल्या पुस्तकातले बाल शिवाजी आमच्याबरोबर मोठे झाले होते, त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. पण शाळा अजूनही तिथेच उभी होती, आजही आहे. तिथे कित्येक विद्यार्थी, शिक्षक येउन गेले असतील पण शाळेचे नाते कितीजणांनी जपले असेल माहित नाही.प्रत्येकाची शाळा थोडया फार फरकाने अशीच असू शकते. शिक्षणाचा श्रीगणेशा जिथून सुरु केला ती आपल्या प्रत्येकाची प्राथमिक शाळा असाधारण महत्वाची असते असे वाटते. कोणाला सुखवस्तूंच्या गर्दीतून कधी शाळेला भेट देता आली तर जरूर द्यावी कारण इथे येउन आपली सुरुवात आपण पुन्हा पाहू शकतो.     
    

Friday, April 24, 2015

रॉक्स - कोक स्टुडिओ


 राम संपथ, सोना मोहपात्रा आणि जस्मिन यांनी दिलेला धमाल संगीत पर्फ़ोमन्स 'कोक स्टुडिओ एम टी व्ही सिझन ३' आणि सत्यमेव जयते मधील एक गीत या सर्वांचे रॉक्स जरूर ऐका आणि पहासुद्धा, खालील दुव्यावर टिचकी द्या.  


पिया से नैना - सोना मोहपात्रा