Wednesday, March 4, 2015

गोवा




२०१० ऑक्टोबर मध्ये आम्ही चार मित्रांनी गोव्याला जायचं ठरवलं त्यांनतर ४ वर्षांनी या ट्रीपविषयी लिहतोय कारण आधी ब्लॉग लिहित नव्हतो. मुंबई ते गोवा अरत-परत प्रवास, गोव्यात खाण्याची , राहण्याची सोय, वाहन तसेच चार दिवसात फिरण्यासाठी बीच आणि स्पॉटवर घालवायचा वेळ इ. नियोजन  सर्व मलाच बघायचं होत. मित्राने फक्त 'मुंबई ते गोवा' विमानाची चार तिकीट बुक केली होती बाकी सर्व मीच पहात होतो कारण मला गोव्याबद्दल बऱ्यापैकी माहित होते आणि माझ्या कंपनीतील ३ सहकारी तिथलेच होते. मी २००१ आणि २००४ मध्ये आधी दोनवेळा गोव्याला जाऊन आलो होतो. ठरल्याप्रमाणे आमचा एक मित्र पुण्याहून मुंबईला आला आणि आम्ही बाकीचे तिघे मुंबईतच होतो. गोव्याला जाण्याच्या एक दिवस आधी रात्री मला एअरपोर्टवर दाखवण्यासाठी ओळखपत्रच सापडत नव्हते परमनंट अकौंट नंबर कार्ड पाकीटमाराने काही दिवसापूर्वीच लंपास केले होते पण खूप शोध घेतला आणि मतदान ओळखपत्र सापडले. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी विमान उडाले आणि बरोबर ५६ मिनिटांत आम्ही गोव्यात 'देबोलिअम'  एअरपोर्टवर  पोहचलो,  असं वाटलं या एअरपोर्टवर बऱ्याच वर्षांनी विमान उतरल असाव इतकी तुरळक गर्दी होती. थोडा शोध घेऊन एका वाहनाने आणि हॉटेल वर पोहचलो 


कंपनीतील सहकाऱ्याने २ दिवस आधी पणजी शहरामध्ये हॉटेलची रूम  बुक करून ठेवली  होती . सिझन नसल्यामुळे बीचजवळ हॉटेल सहज आणि कमी दरात मिळाले असते पण मुद्दाम पणजी शहरात राहण्याची व्यवस्था केली होती कारण आम्हांला बाईकवरून प्रवास करता यावा तसेच चर्च, मंदिर पाहण्यासाठी फिरता यावे. हॉटेलवर पोहचून आम्ही चारही जणांनी सुस्त ताणून दिली, २ तास आराम केला आणि नाश्ता चहा घेऊन तयार झालो आणि  गोवा दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो हॉटेलमधील एकाने दोन दुचाकीची सोय केली होती एक होंडा एक्टीवा आणि दुसरी सी डी १०० त्यावर चार जणांचा प्रवास सुरु झाला.पहिला कलंगुट बीच निवडला आणि तो पूर्ण दिवस  आम्ही बीचवर होतो. तिथेच दुपारचे जेवण उरकले आणि पुन्हा सनसेट होईपर्यंत बीचवर थांबलो. संध्याकाळी बिचवर थांबणे तितकेसे सुरक्षित नसते याची मला जाणीव होती त्यामुळे तिथून लवकर निघायचे होते अशातच अपेक्षित प्रमाणे एक भामटा आमच्या जवळ आला आणि कमी दरात डिस्कोपब मध्ये प्रवेश देतो म्हणून पैसे मागू लागला पण मी पैसे देण्यास साफ नकार दिला. आधी प्रवेश आणि मग पैसे असा मी पवित्रा घेतला शेवटी त्याने डिस्को प्रवेशाची खरी रक्कम सांगितली आणि डिस्कोच्या स्वागतकशातून आपले कामिशन घेऊन पळ काढला. डिस्को मध्ये रात्री २ वाजेपर्यंत एन्जोय केला आणि हॉटेलवर गेलो.




दुसऱ्या दिवशी आम्ही चर्च, मंगेशी मंदिर पाहण्यासाठी राखीव ठेवला होता आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला आमचा मित्र अरविंद याला निरोप द्यायचा होता त्याप्रमाणे त्याला वास्को येथील रेल्वे स्टेशनवर सोडायच होत. चर्च आणि मंदिर पाहून झाल्यावर  दुपारच्या दरम्यान वास्कोकडे कूच केली वास्को मार्गावर बरीच वाहने चालू होती आणि ती ही  चांगल्याच वेगात होती, अशातच एका मध्य रस्त्यात आम्हाला पोलिसांनी थांबवले मी आणि अमर थांबलो  पोलिस आणि फौजदार आम्हाला लायसेन्स? कोठून आला? आणि कोठे चालला आहात? इत्यादी प्रश्न विचारात होते इतक्यात आमच्या मागून येणारे आमचे परममित्र अरविंद यांना आपली सुसाट वेगाने येणारी एक्टीवा आवरली नाही आणि सरळ फौजदार साहेबांच्या पायावर गाडी चढवली. आणि आमचा मित्र अमर हसू लागला त्यामुळे रागवलेल्या साहेबांनी दंडाची रक्कम तिप्पट केली. शेवटी ५०० रुपये दंड भरला तेही आमच्याजवळ लायसेन्स असताना वाहतुकीचे नियम मोडलेले नसताना. बिनपावतीचा दंड भरून आम्ही वास्को येथील एका साध्या हॉटेलात जेवण केल त्यावेळी मिळालेलं जेवण गोव्यातील आतापर्यंतच सर्वात चांगलं अस वाटलं. कोकणी रस्सा, सोलकढी, ओला फ्राय झिंगा आणि सोबतीला थंड बिअर मस्तच ! जेवण करून अरविंदला रेल्वेने पुण्यासाठी रवाना केले, परतल्यावर त्या रात्री पणजी जवळ क्रुझवर गोव्याच्या पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम' पहिला आणि पहाटेपर्यंत बाईकवरून भटकत राहिलो. 


अरविंद पुण्याला सुखरूप पोहचला होता. आम्ही आता तिघेजण उरले होतो त्यामुळे मला 'दिल चाहता है' सिनेमातले गोव्याला गेलेले तीन मित्र आठवले. त्यातला एक इतर दोघांना उद्देशून म्हणतो कि आपल्याला दरवर्षी एकदा तरी गोव्याला आल पाहिजे तेव्हा दुसरा म्हणतो ' वर्षातून एकदा तर दूर राहिलं पण दहा वर्षातून आपलं एकमेकांशी बोलण होईल कि नाही माहित नाही' त्यावर तिसरा आत्मविश्वासाने उतरतो ' आपण भेटू निश्चित भेटू . आणि ते पुन्हा भेटतात सुद्धा, आमच्याबाबतीत आम्ही अस काही ठरवलं नव्हत. चौथ्या दिवशी वोल्वो बसने आम्ही मुंबईला परतलो. पण जी धमाल गोव्यामध्ये आम्ही केली होती ती न विसरण्यासारखी होती. आज चार वर्षानंतर आम्ही चार जण चार दिशेच्या वेगवेगळ्या शहरात आहोत आमचं बोलण फोनवरून आता सोशल नेटवर्किंगवर आलं आहे. हा काळाचा महिमा आहे पण त्या आठवनी आणि अनुभव आम्ही घेऊन परतलो होतो आणि त्या अधून मधून जाग्या होतात  अगदी जशाच्या तशा.            
         

Thursday, February 26, 2015

छत्रपती शिवाजी महाराज



शिवजयंती १९ फेब्रु. २०१५ निमित्ताने 

खूप वर्षांपूर्वी रणजीत देसाई यांचे  'श्रीमान योगी' हे पुस्तक वाचले होते, अशी शेकडो छोटी मोठी पुस्तके छ. शिवाजी महाराजांविषयी लिहिली गेली आहेत , पण वाचून समाधान वाटेल अस या पुस्तकात काही लिहलं गेल नसावं. शिवकालीन खरा इतिहास समोर आणणारी पुस्तके हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत. खूप जणांना असही वाटत असेल कि ' काय करायचं आहे या इतिहासाच ' खर -खोट करून. फेसबुक आणि व्हाटसप सुद्धा आउटडेटेड होत चाललेल्या  जगात या इतिहासाने काय फरक पडतो. सतत नवीन टेक्नोलॉंजी येते आहे जग वेळेच्या पुढे धावतंय. पण हे पत्येक वेळेस नवीन येणारं झपाटयान मागे सुद्धा पडतंय  मग ते कोणतही क्षेत्र असो त्यामध्ये एक व्यतिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज जे लोकांच्या मनावर साढे तीनशे वर्षांच्या वर काळ लोटला तरी अढळ आहे. महाराष्ट्रात जन्माला येणारया प्रत्येक पिढीला महाराजांचं व्यतिमत्व त्यांचा इतिहास कमी अधिक प्रमाणात का होईना आकर्षित करतोच (काही अपवाद असतात --  ऑनलाईन जन्मलेली एन्टीक ओब्जेक्ट्स ) …. 

तर काय फरक पडतो, या खऱ्या इतिहासामुळे ? त्याचं उत्तर आहे 'हो' !  फरक पडतो किमान शिवाजी महाराजांच्या इतिहासाने तर पडेलच असा हा इतिहास आणि तितकेच मोठे आहेत महाराज. समाजातल्या सर्व जाती -धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि निर्माण केलेलं ते साम्राज्य पुरंदरच्या तहात जवळपास गमावलं. तरीही महाराजांनी कधी हार मानली नाही. या दोन्ही गोष्टीतून महाराजांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण सकारात्मक आणि प्रयत्नवादी होता हेच वाटेल. अशा कितीतरी गोष्टी या इतिहासात घडल्या ज्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पण त्यासाठी योग्य आणि खरी माहिती देणारं पुस्तक उपलब्ध असलं पाहिजे. 

असच एक पुस्तक मी वाचलं कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता ?'  हे पुस्तक अप्रतिम आहे, वाचायला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊन तास लागतो, हे पुस्तक तुमचा अमूल्य असा वेळ  घेणार नाही. ७० पानांचं हे पुस्तक तुम्हाला ' शिवाजी महाराज कि जय' अस का म्हणायचं याच उत्तर देईल. महाराजांनी या भूमीसाठी नेमकं काय केलं याबद्दल पण बऱ्याच जनांना माहिती नसेल किवा चुकीची माहिती असेल, ज्यांना महाराजांबद्दल वाचायला, बोलायला आवडतं त्यांनी तर नक्कीच वाचावं. 

 पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर टिचकी दयावी