Monday, May 23, 2016

कि -चेन

"ऐ तिथं हाथ लाऊ नको" अशा अचानक आलेल्या मोठ्या आवाजाने तीन वर्षाचे मुल दचकले आणि  फोटोसमोरचे उचलेले फळ तिथेच ठेऊन त्याने रडायला सुरुवात केली, मागून त्याची आई आली आणि  मुलावर ओरडणारी वयस्क व्यक्ती काही बोलण्याआधी मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून त्याला तिथून घेऊन गेली. मोबाईल आणि वर्तमानपत्रात माना घातलेली सात-आठजण  मात्र एक नजर टाकून पुन्हा काही-बाही वाचण्यात गुंग झाली. त्यांच्या साठी तो एक शोर्ट ब्रेक असावा. घराच्या मोकळ्या आवारात झाडाखाली हार घातलेल्या आणि अगरबत्ती लावलेल्या फोटोच्या डाव्या बाजूला आठ-दहा आणि उजव्या बाजूला तेवढ्याच खुर्च्या मांडल्या होत्या. खाली सतरंजीवर काहीजण बसले होते. मध्यभागी वर्तमानपत्राचे काही अंक ठेवले होते, त्यातले काहीजण पुन्हा -पुन्हा त्याच बातम्या वाचत होते. दोघेजण आपसांत लांबलेल्या पावसाविषयी एकमेकांना एकू येईल अशा आवाजात चर्चा करत होते, तर चारजण कॉलेजला जाणारा मुलगा अपघातात कसा गेला ?,  दोन वर्षांपूर्वीच आजारात आई गेली आणि आता तरुण वयात हा मुलगा गेला म्हणून  हळहळ व्यक्त करत होते.  तिथूनच थोड्या अंतरावर काही बायका जमलेल्या माणसाच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या, त्यामध्ये एक साठी उलटलेले गृहस्थ स्वयंपाक चविष्ट होण्यासाठी आचारयाला सूचना करत होते तेवढ्यात त्या गृहस्थांच्या पत्नीने त्यांच्यावर डोळे मोठे करून पहिले आणि हा स्वयंपाक तेरावीचा आहे आणि तो हौसेने चालला नाही याची जाणीव करून दिली आणि त्यांच्या सूचना बंद केल्या.

काहीवेळाने एक मध्यमवयीन स्त्री फोटोजवळ येउन गळा काढून रडू लागली त्यामुळे पुन्हा एकदा मोबाईल आणि वर्तमानपत्रातल्या माना वर झाल्या. अपघातात गेलेल्या मुलाचे वडील त्या स्त्रीचं सांत्वन करत तिला घेऊन ते घरात गेले. आता जवळपास सर्व नातेवाईक आणि ओळखीचे आजू बाजूचे लोक जमले होते. एक व्यक्ती चार फुले आणि चंदनाची पाने सर्वांच्या हातात देत होता. सर्वांनी पुढे होऊन ती पाने -फुले फोटोसमोर ठेऊन आपली श्रद्धांजली वाहिली. तिथेच जागा मोकळी करून लोकांना जेवण वाढण्याची व्यवस्था तीन-चार तरुण करत होते, जमलेले नातेवाईक आणि ओळखीचे लोक मान खाली घालून जेवत होते , सर्व लोकांची आणि घरातील बायकांचे जेवण उरकले होते, तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. सर्व जमलेले लोक आपापल्या घरी गेले होते आता घराच्या मागच्या बाजूला घरातील मोजक्या स्त्रिया घरातल्या चर्चा बसल्या होत्या तर पडवीत पुरुष लोक आराम करत होते. घराच्या बाहेरील आवारात जिथे फोटो ठेवला होता तिथे जवळच एक आजोबा झोपले होते. काही वेळाने घरातल्या एका मोठ्या मुलाने तो फोटो उचलून घरात नेउन ठेवला, घराजवळ एक भयान शांतता पसरली त्या शांततेला भेदणारा एक कोकिळेचा आवाज मधून मधून येत होता, पण ते दुसऱ्या कोणाला मंजुळ वाटणारे स्वर कोणा एका व्यक्तीला क्लेशदायक वाटत होते. गेलेल्या व्यक्तीच्या घरापासून चार घर सोडून आपल्या वरच्या मजल्यावरून गेले तेरा दिवस त्या व्यक्तीचे डोळे त्या फोटोचा वेध घेत होते. आता त्या फोटोची जागा रिकामी झाली होती. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या आठवणी होत्या, दुख गळ्यापर्यंत दाटून आल होते पण त्या दुखाला मोकळे होण्यासाठी अश्रूंची वाट पुरेशी नव्हती, तिला वाटत होत एकदाच ओरडून रडून घ्यावं पण का ? कधीपासून? असल्या प्रश्नांना द्यायला उत्तरं तिच्याकडे नव्हती. तो या जगात होता तोपर्यंत तिला पहिल्या भेटीच्या आठवणी मोहरून टाकायच्या पण त्याच आठवणी आता जीवघेण्या वाटत होत्या. त्याने  प्रेमाची पहिली भेट म्हणून दिलेले  एक कि-चेन तिच्याकडे होते त्यात रंगीत पाण्यात एक बाहुला आणि बाहुली एकमेकांना मिठी मारून गोल गोल फिरत होते. त्या वस्तूचा स्पर्श आता आयुष्यात जीवघेण्या रिकामेपणाची जाणीव करून देत होता.

Thursday, May 12, 2016

चिखलातला नंदी काढायचा कोणी?

एकदा भगवान शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते.  देवी पार्वतीचे लक्ष एका छोटयाशा गावावर खिळले होते, देवी खूप सूक्ष्म निरीक्षण करत होती. भगवान शंकर स्मित हास्य करीत देवी पार्वतीकडे पहात होते. देवीला त्या गावामध्ये कमालीची विषमता दिसत होती काही लोक खूप श्रीमंत होते, काही उच्च मध्यमवर्गीय तर काही कनिष्ट मध्यमवर्गात मोडणारे लोक होते. कनिष्ट मध्यमवर्गीय लोक आपले जीवन जगताना त्रासिक कसरत करत होते. जीवनावश्यक मुलभूत गरजा पुरवतानाही त्यांच्या नाकी नऊ  येत होते,  या सर्वांच्या हाताखाली राबणारे काही गरीब लोक होते ते मात्र खूप हालअपेष्टा सोसत जीवन कंठत होते. हे सर्व पाहून देवीला ही विषमता नष्ट व्हावी असे वाटू लागले.

देवीने ही  विषमता नष्ट करण्याची आणि सर्व लोकांना सर्वसुखी आणि श्रीमंत करण्याची विनंती महादेवाना केली परंतु हे प्रकृतीच्या विरुद्ध होईल म्हणून महादेवांनी या मागणीस मनाई केली. पण देवीने हट्टाला पेटून ही तिची विनंती मान्य करून घेतली.

महादेवानीही  'तथास्तु' म्हणून त्या गावाचा क्षणार्धात कायापालट केला. आता या गावात काही झोपड्या ऐवजी सर्वठिकाणी टुमदार वाडे दिसत होते. अंगावर भरजरी कपडे आणि दाग - दागिने घातलेले लोक मिरवत होते. प्रत्येकाला खायला पंच-पक्वान होते, बाहेर येण्या-जाण्यासाठी सर्वांच्या दारात टांगे उभे होते. एशोआरामात जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा होत्या तरीही कोणत्यातरी गोष्टीची कमतरता देवी पार्वतीला भासत होती.

देवीने पुन्हा या कमतरतेचा शोध लावण्याची विनंती महादेवाना केली, ही विनंती महादेवांनी लगेच मान्य केली आणि त्या कमतरतेचा शोध लावण्यासाठी स्वत: या गावाला भेट देण्याचे ठरवले. म्हणून महादेवानी त्यांचा अतिप्रिय भक्त नंदीला सोबत घेतले आणि  एका शेतकऱ्याच्या रुपामध्ये या गावात दाखल झाले. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक पणे एका चिखल असलेल्या खड्ड्यात नंदी अडकला. नंदीला बाहेर काढणे आवश्यक होते म्हणून त्या शेतकऱ्याने जवळच एका टुमदार वाडयाचा दरवाजा ठोठावला, आतून एका श्रीमंत व्यक्तीने  दरवाजा उघडला आणि काय पाहिजे? अस त्रासिक मुद्रेने विचारले. शेतकऱ्याने गावच्या हद्दीजवळ आपला बैल चिखलात अडकला असून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली, पण त्या शेतकऱ्याचे बोलणे पूर्ण होण्याआधी त्या श्रीमंत व्यक्तीने सोन्याच्या मोहरांची एक थैली त्याच्या हातात दिली आणि  काही लोकांना या मोहरा देऊन त्या मोबदल्यात आपला बैल बाहेर काढ असा सल्ला दिला आणि त्याने आपला दरवाजा बंद केला.  

शेतकरी आता पुढच्या घरात मदत मिळेल या आशेने पूर्ण गाव फिरून आला मात्र कोणीही श्रमदान केले नाही. प्रत्येकाने आर्थिक मदत देऊ केली, पण बैल बाहेर काढण्यासाठी त्या शेतकऱ्याला दोन-तीन लोकांची गरज होती, या गावाच्या जवळपास दुसरे कोणतेही गाव नव्हते त्यामुळे वेळेत मदत मिळणे गरजेचे होते. त्यामुळे महादेवानी आपला नंदी स्वतःच  चिखलातून बाहेर काढला, आणि कैलास पर्वतावर परतले. महादेवानी कायापालट केलेल्या या गावात सर्वच लोक श्रीमंत झाले होते त्यामुळे त्यांना कोणी नोकर मिळत नसे अशाने लोक आपली काम फक्त आपणच करत होते दुसऱ्याच्या कामाला कोणी हात लावत नव्हते. आपोआपच सर्वांमध्ये स्वार्थीपणा निर्माण झाला होता. प्रत्येकाच्या स्वभावात राग, द्वेष  आणि मत्सर वाढला होता. या गावच्या लोकांमधून माणुसकी हरवली होती.  हे सर्व देवी पार्वतीला जाणवले होते म्हणून या गावाला जसे होते तसे करण्याची विनंती केली. आणि महादेवानी 'तथास्तु' म्हणून ती मान्य केली.

महादेवानी देवी पार्वतीला सांगितले ' जेव्हा निसर्गनियम मोडून एखाद्या गोष्टीची खूप मोठी प्रगती होते ती तकलादू असते, मानवी स्वभाव तर खूप लवचिक आहे त्यामुळे त्यांनी आपला उद्धार आपल्या प्रयत्नाच्या जोरावर  करावा आणि माणुसकी हे मानवी स्वभावाचे मुलभूत अंग आहे त्याचा विसर कधी पडू देऊ नये. अन्यथा 'चिखलातला नंदी काढायचा कोणी? अशी अवस्था होते